गंधर्वनाम संवत्सरे - पु. ल. देशपांडे

गंधर्वनाम संवत्सरे …

या नव्या वर्षाचं नाव पंचांगकर्त्यांच्या लेखी काहीही असलं तरीमराठी नाट्य आणि संगीतप्रेमी माणसाच्या हिशेबी हे बालगंधर्वनामे संवत्सरच आहे. बालगंधर्व नावाचा या महाराष्ट्राच्या नाट्यकला क्षेत्रात जो एक चमत्कार घडला, त्या विस्मयकारक नटवराच्या जन्मशताब्दीचं हे वर्ष आहे. जीवनाच्या निरनिराळ्या क्षेत्रांत उत्तम दर्जाचं कार्य करणाऱ्यांना श्रेष्ठत्व मिळतं, लोकप्रियता मिळतं. पण विभूतिमत्त्व लाभतंच असं नाही. ही कुणी कोणाला उचलून द्यायची पदवी नाही. विभूतिमत्त्वाच्या देवाणघेवाणीची तिथी सांगता येत नसते. बालगंधर्वांना असं विभूतिमत्त्व लाभलं आणि तेदेखील ज्याकाळात ते वावरत असलेल्या नाट्यक्षेत्राकडे अवहेलनेनं पाहिलं जायचं अशा काळात असंख्य रसिकांच्या मनात त्यांनी घर केलं. यामागलं रहस्य शोधून काढायचा अनेक कलावंतांनी आणि कला समीक्षकांनी प्रयत्न केला. त्यांच्या अभिनय गुणांचे, गायनातल्या वैशिष्ट्यांचे, त्यांच्यातल्या उणिवांचे विश्लेषण करणारे लेख लिहिले, भाषणं केली. आपली चिकित्सक बुद्धी पणाला लावली. एवढे करूनही या कलावंताला लाभलेल्या विभूतिमत्त्वाचं रहस्य हाती पूर्णपणे लागल्याचं समाधान कुणाला मिळालं असेल असं वाटत नाही.

वास्तविक बालगंधर्वांहून अधिक सुंदर दिसणारे आणि अधिक प्रभावी रीतीनं गाणारे कलावंत त्या वेळी होते आणि आजही आहेत. अण्णा किर्लोस्करांच्या शाकुंतल-सौभद्रपासून आजतागायत चालत आलेल्या मराठी नाटकांविषयीच्या मराठी रसिकांच्या मनातल्या जिव्हाळ्याची ज्यांना कल्पना नाही अशी माणसं तर म्हणतील, की स्त्री-वेश घेऊन नाटकात नाचणाऱ्या एका नटाचं ही मंडळी हे काय एवढं स्तोम माजवताहेत! त्यांना बालगंधर्वांना लाभलेल्या रसिकांच्या प्रेमाची प्रतच कळणे अवघड आहे. म्हणूनच कविवर्य माडगूळकर जेव्हा ‘ असा बालगंधर्व आता न होणे ‘ अशी ओळ लिहून गेले तेव्हा हजारो मराठी रसिकांना कवी आपल्या मनातलं बोलला असंच वाटलं.

अत्यंत अवघड गोष्टी अगदी सोप्या आहेत असं करून दाखवणं ही असामान्य प्रतिभावंतांनाच साधणारी किमया आहे. गहन तत्त्वज्ञान देखील ग्यानबा-तुकाराम सोपे करून सांगतात. आणि वरपांगी सोपी वाटणारी ओवी किंवा अभंगातली ओळ अनुभवायचा प्रयत्न करायला लागलं, की ती ओळ किती खोल पाण्यातून आली आहे याची जाणीव होते. इथे आपले हात जोडले जातात ते ही असली अद्‌भुत किमया घडविणाऱ्या ‘ प्रतिभा ‘ नावाच्या शक्तीपुढे! कुणी मग त्याला देवाचं देणं म्हणतात. कुणी पूर्वजन्मीची पुण्याई म्हणतात. त्या तर्का पलीकडल्या अनुभवाला काहीतरी म्हटल्याशिवाय आपल्याला राहवत नाही आणि मग आपण काहीतरी म्हणत असतो. पण असले आनंददायक अनुभवच आयुष्यभर आपले खरे सांगाती असतात.

आयुष्यातली सारी कृतकृत्यता असल्या अनुभवांच्या क्षणांची एखाद्यापाशी किती साठवण आहे यावर जोखायची असते. ज्यांना श्रेष्ठ प्रतिभावंत म्हणावे असे कलावंत वरुणासारखी असल्या आनंदाच्या सरींची बरसात करून असंख्य मनांचे मळे फुलवीत असतात. बालगंधर्व हा असाच एक वरुण सूर बरसत राहणारा. नुसत्या गाण्यातूनच नव्हे तर गद्यातून विद्धात्यांच्या स्मरणानं भीमपलास, बागेश्री, यमन, बिहाग, खमाज यारागांची एकदम कारंजी मनात उडायला लागतात. तसेच तुषार स्वयंवरातल्या ” दादा ते आले ना ” किंवा ” खडा मारायचा झाला तर… ” किंवा एकच प्यालातल्या ” हे चरण जिथं असतील तोच माझा स्वर्ग ” किंवा द्रौपदीतल्या ” जा! दुःशासनाला म्हणावं द्रौपदीस्वतंत्र आहे.. .द्रौपदी स्वतंत्र आहे. द्रौपदी कुणाची दासी नाही, बरंदासी नाही ” यासारख्या गद्य वाक्यांच्या स्मरणानंही उसळतात. त्यांची ‘ अन्नदाते मायबाप हो ‘ ही आर्जवी हाक आठवली की त्या स्मरणानं अंगावर काटा उभा राहतो. मन भरून येतं. आयुष्यातल्या एका पुष्पपराग सुगंधित स्मृतिपथावरून आपण सहलीला निघाल्यासारखं वाटतं. हा स्मृतिपथ किती दूरवर घेऊन जाईल हे सांगता येत नाही.

गंधर्वांचे नाटक पाहणं हे नुसतं तिकीट काढणं आणि थेटरात जाऊन नाटक पाहणं एवढंच नसे. कुटुंबात एखादं शुभकार्य निघावं तसं गंधर्वांचे नाटक पाहायला जाण्याचं कार्य निघायचं. थेटरात तास तास आधी जाऊन पोहोचायचं. मग गणपतराव बोडस, मास्तर कृष्णराव, रानडे ही मंडळी रंगपटाकडे जाताना बघायला मिळत.विठोबाच्या देवळाच्या प्रांगणात निवृत्ती-ज्ञानदेव ही संतमंडळी साक्षात दिसावी तसं वाटे. आमची तिकिटं पिटातली किंवा त्याच्या आसपासची माडीवरची असायची. मग माडीवरून खाली पुढल्या कोचाकडे येणारी धनिक मंडळी दुरून पाहायची. एकदा यात ऑपेरा हाऊसमध्ये अल्लादिया खाँसाहेब आले होते. वडिलांनी मला त्यांना वाकून नमस्कार करायला लावला होता.

वडिलांचे बालपण कोल्हापुरात गेल्यामुळे अल्लादियाँ, बूजीखाँ, मजीखाँ ही नावं माझ्या कानावरून फारलहानपणी गेली होती. त्या एकच प्याल्यानंतर पुढे बालगंधर्वांची कितीतरी नाटकं पाहिली. रिपन थिएटरात पाहिलेल्या त्यांच्या कान्होपात्रेत शेवटी विठ्ठलचरणी विलीन होऊन काष्ठवत झालेली कान्होपात्रा पाहताना अभिनयातला तो मला एक चमत्कार वाटला होता. त्या नाटकाच्या प्रयोगाची एक मजेदार आठवण आहे.एरवी स्टेजसमोर गादीवर बसून आपल्या तबल्यानं लोकांना जागच्याजागी नाचायला लावणारे थिरखवा खाँसाहेब गंमत म्हणून नाटकातल्या भजनात वारकरी वेश चढवून पखवाजी पांडोबा बोंद्र्यांच्या शेवटी टाळ वाजवीत नाचत होते.

माझा आयुष्यात एकाचढी एक गायक-वादक ऐकायचा योग मला लाभला. त्या गायकांशी तुल्यबळ म्हणावे असे आजही तरुण गायक-गायिकांचे गाणे बजावणे ऐकायला मिळते. पण बालगंधर्वांच्या स्वराची किमया काय आहे ते मात्र कळत नाही. तास तास तयारीनं पिसलेल्या भीमपलासापुढे बालगंधर्वांनी त्याच भीमपलासात ” देवाधरिले चरण ” एवढी नुसती तीन शब्दांची ओळ भिजवून काढली की ऐकणाराला सगळा भीमपलास एका क्षणात आपल्या शरीराबाहेर रंध्रारंध्रातून आत झिरपत गेल्याचा अनुभव यायचा. बरं, हा काही केवळ ‘ रम्य ते बालपण छाप अभिप्राय आहे असं नाही. मधे एककाळ असा आला होता की, चित्रपट संगीताच्या लाटेत बालगंधर्वांची स्वरांची द्वारका बुडून जाणार की काय अशी भीती वाटत होती. पण कुठे काय जादू झाली कळत नाही. मराठी संगीतसृष्टीत ही सारी गायकी पुनर्जन्म घेतल्यासारखी प्रकटली. बालगंधर्वांना ज्यांनी कधी प्रत्यक्ष पाहिलं नाही की प्रत्यक्ष ऐकलंही नाही अशी गुणी मुलं त्यांच्या ध्वनिमुद्रिका ऐकून, त्या गायकीतली गहिराई ओळखून ती गाणी आत्मसात करण्यात आनंद मानताना दिसायला लागली.

मला कधी कधी इतकी मजा वाटते की एरवी सगळे ‘ मॉड ‘ संस्कार असलेली तरुण मुलंमुली जर चांगल्या संगीताची नजर लाभलेली असेल तर बालगंधर्वांच्या गाण्यातल्या ज्या विशेष सौंदर्यस्थळांना साठ-सत्तर वर्षांपूर्वी दाद मिळायची त्याच जागांना तितक्याच आनंदानं दाद देताना दिसतात. कलेच्या सौंदर्यात ही अशी एक कालनिरपेक्ष आनंद देणारी शक्ती असते. कलावंत जाणून घेणं म्हणजे त्या शक्तीचीलीला जाणून घेणं असतं. असा स्थल कालनिरपेक्ष आनंद देण्याचं सामर्थ्य एकतर निसर्गात असतं किंवा निसर्गासारख्याच निरपेक्ष सहजतेनं फुललेल्या कलेच्या दर्शनात असतं. त्यातील निरपेक्षता आणि सहजता या दोन्ही गोष्टी अमोल असतात. खळखळत वाहणं हा निसर्गाचा सहजधर्म. तसाच सहजधर्म म्हणून गळ्यातून सूरवाहतो असा साक्षात्कार घडवणारा गतिमानी गायक कलावंत म्हणजे निसर्गानं निरपेक्ष भावनेनं आपल्याला दिलेल्या पौर्णिमेच्या चांदण्याच्या, सूर्योदयाच्या फुलांच्या ताटव्यांच्या, खळाळणाऱ्या निर्झराच्या देण्यासारखं एक देणं असते. ते कोण आणि कुठे आणिकसे घडवितो हे कोडं सुटलं असते तर बालगंधर्वांच्या गाण्यातल्या आनंदकोशाचं रहस्य उमगलं असतं.

शंभर वर्षांपूर्वी सूरलयीचा स्वयंभू अवतार असल्यासारखा साक्षात्कार घडवणारे हे देणं महाराष्ट्रात जन्माला आल. सूर आणि लय यांचे पार्वतीपरमेश्वरासारखे संपृक्त स्वररूपातले दर्शन त्यानं रसिकांना घडवलं आणि तेही कुठून? तर स्वतःला शिष्ट समजणाऱ्या समाजातल्या लोकांनी अपवित्र-ओंगळ मानून बहिष्कृत केलेल्या नाटकाच्या मंचावरून. आंगणातल्या मातीत रांगणाऱ्या बालकृष्णानं आपल्या चिमण्या मुखाचा ‘ आ ‘ करून यशोदेला विश्वरूपदर्शन घडवलं… तसं या बालगंधर्वानंही नाटकातल्या गाण्यासाठी लावलेल्या ‘ आ ‘कारामागचे भारतीय अभिजात संगीतातलं विश्व जाणकारांच्या अनुभवाला आणून दिलं. विचारहीन अरसिकांनी हीनत्वाचा डाग देऊन चोरटा संबंध ठेवायच्या लायकीची कला ठरवलेल्या संगीतकलेला जणू शापमुक्ती लाभली. घराघरात नव्हे तर मराठीमाज घरा-माजघरात गंधर्वांचं गाणं गेलं. त्याचा आदर झाला. लाड झाले. स्त्री-पुरुषांनी मोकळ्या गळ्यानं त्या गाण्यांशी सलगी जोडली.महाराष्ट्राला वरदानासारखं लाभलेलं हे स्वरदान. मनाच्या झोळीतते कृतज्ञतेनं स्वीकारावं आणि स्वतःला धन्य मानावं.

म्हणून म्हणतो की या नव्या वर्षाचं नाव पंचांगकर्त्यांच्या लेखी काही ही असलं तरी मराठी नाट्य आणि संगीतप्रेमी माणसाच्या हिशेबी हे गंधर्वनाम संवत्सरेच आहे.


पु. ल. देशपांडे – कालनिर्णय निवडक (१९७३ – २००९)

2 comments

  1. Mandar Kulkarni

    असा स्थल कालनिरपेक्ष आनंद देण्याचं सामर्थ्य एकतर निसर्गात असतं किंवा निसर्गासारख्याच निरपेक्ष सहजतेनं फुललेल्या कलेच्या दर्शनात असतं. त्यातील निरपेक्षताआणि सहजता या दोन्ही गोष्टी अमोल असतात.
    Pula Deshpande swatahabaddalach bolat hote..
    24 Carat sona 🙂

  2. HRISHIKESH SUBHASH PEDNEKAR

    PL DESHPANDE NA KUTHALE VISHESHAN LAVAVE HA PRASHNA PADTO… KARAN SHABDHA KOSHAT TYANA SAZEL ASE VISHEHAN NAHI..

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.